देवेंद्र फडणवीस व अजित पवारांवर राज्यपालांनी गुन्हा नोंद करावा, संजय राऊतांचा हल्लाबोल
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केसाने गळा कापल्याचा आरोप नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सिंचन घोटाळ्याप्रकरणी तपास झाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
खासदार संजय राऊत म्हणाले, ” आर. आर. पाटील अत्यंत प्रामाणिक आणि कर्तबगार व्यक्ती होते. त्यांनी गृहमंत्री म्हणून कधीच चुकीचं काम केलं असेल असं आम्हाला वाटत नाही. त्यांचे केस फार लहान असल्याने ते केसाने गळा कापू शकत नाहीत,” असा टोलाही राऊत यांनी अजित पवारांना लगावला आहे.
आर.आर. आबांचे केस लहान असल्यामुळे…या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ” माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सिंचन घोटाळ्यावर सही केल्याचे अजित पवारांनी जनतेला दाखवले तसेच फडणवीस यांनी त्यांना सही केल्याचे दाखवले. याकरता आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा. कारण या दोघांनी संविधानाप्रमाणे गोपनीयतेची शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर अशी माहिती सार्वजनिक करणे, हा गोपनीयतेचा भंग असून फार मोठा गुन्हा आहे. या कारणानं राज्यपालांनी या दोघांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश दिले पाहिजेत.” असा हल्लाबोल करत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.