महापालिकेच्या ठेवी मोडल्या हा आरोप चुकीचा, आजही ८२,८०० कोटींची ठेव, मुंबईला लुटणाऱ्यांना आरसा दाखवला, एकनाथ शिंदेंचा टोला
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – महापालिकेच्या ठेवी मोडल्या हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. सध्या ८२,८०० कोटी रुपयांच्या ठेवी असूनही मुंबईतील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आधी विकासकामं होत नव्हती, आता विकासकामांमध्ये वाढ झाली आहे असंही ते म्हणाले. मुंबई महापालिकेच्या एफडी मोडल्या नसल्याचा दावाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला. मुंबई महापालिकेच्या ठेवी महायुतीकडून मोडल्या जात आहेत, त्यातील पैसे काढले जात आहेत असा आरोप सातत्याने ठाकरे गटाकडून केला जातोय. या आधी मुंबई महापालिकेच्या ठेवी या ९१ हजार कोटींहून अधिक होत्या. आता त्या ८२ हजार कोटींवर आल्या असून महायुती सरकारने या ठेवी मोडल्या असा आरोप केला जात आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आरोप करणाऱ्यांना आम्ही काम करुन उत्तर देतोय. त्यामुळेच मुंबईच्या तिजोरीत आज सात हजारांची भर पडली आहे. मुंबईत आज ४३ हजार कोटींची विकासकामं केली जात आहेत. त्यामुळे एफडीबद्दलचे सगळे आरोप खोटे आहेत, ते वस्तुस्थितीला धरून नाहीत.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “विकास करताना खर्च वाढला आहे. पूर्वी विकासावर खर्च केला जात नव्हता. आता विकासावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोय. त्यामुळे ठेवी मोडल्या हा आरोप चुकीचा आहे. त्यासंबंधी आयुक्तांना विचारून घ्या. पूर्वी २५ टक्के रक्कम ही विकासकामांवर खर्च व्हायची. त्यामध्ये आता ५८ टक्के रक्कम ही विकासकामांवर केली जातेय. त्यामुळेच पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये मुंबई खड्डेमुक्त होणार आहेत.” ठाकरे गटाने केलेल्या आरोपावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “आता मुंबई महापालिकेची एफडी ८२,८०० कोटी रुपये असूनही विकासकामांवर एवढा मोठा खर्च होतोय. याचा अर्थ या आधी मुंबईला लुटणारे लोक होते, त्यांना आम्ही आरसा दाखवला आहे. जे मुबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत होते त्यांना आता अडीच वर्षात कसा विकास होऊ शकतो हे आम्ही दाखवले असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावला. तसेच आरोप करण्यापेक्षा सकारात्मक बाजू तपासा असा सल्लाही त्यांना दिला.” एकनाथ शिंदे म्हणाले की, “विरोधकांना टिका आणि आरोपांशिवाय काही काम नाही. आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प झाला. त्यामध्ये कुठलीही करवाढ नाही, दरवाढ नाही. असा मुंबईच्या सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. मुंबई वेगाने विकसित होत आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई खड्डेमुक्त करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या. त्यावेळी जवळपास ३ हजार कोटी आपण रिपेअरवर खर्च केलेत. आपले दोन्ही फेज सिंमेट काँक्रिटने करण्याचे सुरु आहे. पुढच्या दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होणार.”